सोमवंशी क्ष. स. संघाचा क्रीडा महोत्सव दि. ११ व १२ जानेवारी २०२५ रोजी नरवीर चिमाजीआप्पा मैदानावर उमेळा शाखेच्या वतीने अतिशय सुनियोजित पद्धतीने पार पडला. उमेळे शाखेतील तमाम बंधू भगिनी, सर्व कार्यकर्ते यांस सस्नेह नमस्कार व खुप खुप अभिनंदन, आपली एकजूट, प्रचंड मेहनत, शिस्तबद्ध, खिलाडूवृत्ती तसेच सर्वच प्रकारच्या आघाडीवर ऊत्तम आयोजन, लहान मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्ती पर्यंत सर्वच कार्यकर्ते शनिवार व रविवार पर्यंत न थकता न दमता मैदानावर प्रचंड मेहनत करताना दिसुन येत होते यामुळे नक्कीच इतर शाखेतील तरूणांना हा क्रीडा महोत्सव प्रोत्साहन देणारा असा असेल यात शंका नाही. आपण ही क्रीडा स्पर्धा अत्यंत कमी कालावधीत यशस्वी केल्याबद्दल ऊमेळे शाखेतील समाज बांधव तसेच महिला भगिनी यांचे विशेष आभार व ही क्रीडा स्पर्धा सदैव स्मरणात राहील यात तीळमात्र शंका नाही. सो क्ष स संघ अध्यक्ष मा श्री भाईसाहेब तसेच संघ पदाधिकारी ,संघ विश्वस्त आणि समाजातील सर्व जेष्ठ - श्रेष्ठ सामाज बंधु- भगिनी आपण आपल्या उमेळे शाखेने सो क्ष स संघ पुरस्कृत आणि उमेळे शाखा आयोजित क्रीडा स्पर्धांमध्ये उपस्थित राहून आपल्या क्रीडा स्पर्धेची शान वाढविली. श्री. भाईसाहेबांच्या नवीन सूत्रबद्ध नियोजनानुसार सर्व संघपदाधिकाऱ्यांनी या क्रीडास्पर्धांची आखणी केली असली तरी क्रीडा समितीचे समन्वयक आणि संघचिटणीस श्री. प्रफुल्ल म्हात्रे यांच्या दीर्घ अनुभवाची, त्यांच्या अनेक दिवसांच्या सूत्रबद्ध आखणीची तसेच स्पर्धाकाळात, स्पर्धास्थानी तळ ठोकून घेतलेल्या विशेष परिश्रमांची खास नोंद घ्यावी लागेल. त्यांना तेवढीच साथ माजी समन्वयक आणि विद्यमान उपाध्यक्ष श्री. प्रीतम म्हात्रे आणि संघचिटणीस श्री. विविध पाटील यांचीही होती. आर्थिक जबाबदारी अर्थातच संघखजिनदार श्री. प्रमोद पाटील यांनी सांभाळली. शनिवारी दुपारी दोन वाजता उद्घाटनाच्या कार्यक्रमात ईशस्तवन, स्वागतगीत, क्रीडाज्योत प्रज्वलन, ध्वजवंदन, मानवंदना, प्रतिज्ञा असा कार्यक्रम झाला. उद्घाटन समारंभात अध्यक्ष मा. श्री. भाईसाहेब राऊत, स्वागताध्यक्ष मा. श्री. भालचंद्र चौधरी, प्रमुख अतिथी लोकनेते मा. श्री. हितेंद्रआप्पा ठाकूर, उद्घाटक मा. श्री. सुधीर म्हात्रे, विशेष अतिथी मा. श्री. हेमंत म्हात्रे व मा. श्री. आशय राऊत या सर्वांचा परिचय व सन्मान करण्यात आला व त्यांनी समायोचित शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. रविवारी पारितोषिक वितरण व समारोप समारंभात अध्यक्ष मा. श्री. भाईसाहेब राऊत, प्रमुख अतिथी मा. श्री. प्रशांतजी चव्हाण, विशेष अतिथी मा. श्री. शिरीष राऊत, मा. श्री. नरेंद्र राऊत, मा. श्री. नितीन म्हात्रे यांचा सन्मान करण्यात आला आणि त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन श्री. प्रफुल्ल म्हात्रे यांनी केले. त्यांना श्री. मनीष वर्तक, सौ. जोया चौधरी, सौ. सेजल वर्तक यांचे यांनी मोलाचे सहकार्य केले. राष्ट्रगीताने सोहळ्याची सांगता झाली. मिलिंद कॅटरर्स यांनी पुरवलेली भोजन व्यवस्था अतिशय चांगली होती. रुचकर भोजनाचा आस्वाद १५०० + बांधवांनी घेतला. डेकोरेशन व्यवस्था प्रेक्षणीय होती. माईक व्यवस्थाही खूप चांगली होती. या सोहळ्यात क्रीडा आणि समाज प्रेमापोटी अनेक समाजबांधव व माजी पदाधिकारी उपस्थित होते. सर्व मा. विश्वस्त आणि पदाधिकारी दोन्ही दिवस समारंभस्थानी उपस्थित होते. मुख्य विश्वस्त मा. डाॅ. श्री. दीपकभाई चौधरी यांच्यावर उत्तर कोकण महोत्सवाची मोठी जबाबदारी असूनही त्यांनी या सोहळ्यास भेट दिली. क्रीडा समितीने या महोत्सवात अतिशय मोलाची भूमिका तर बजावलीच पण समितीतर्फे समाजवास्तूसाठी ७५,००० रुपयांची मोठी देणगी देऊन समाजप्रेम व्यक्त केले. विविध शाखांमधून अनेक खेळाडू या स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते. महिला व पुरुषांसाठी सांघिक व वैयक्तिक स्पर्धा होत्या. वैयक्तिकसाठी विविध गटांमध्ये विभाग विभागणी केलेली असल्यामुळे अनेकांना त्यात सहभागी होत आले. कोठेही संघर्ष निर्माण झाला नाही. सुमारे तीन-चार हजारांचा जनसमुदाय खेळांचा आनंद अनुभवताना मन भरून येत होते. आपला समाज सुसंस्कृत आहे असे आपण ठामपणे म्हणू शकतो. संख्येने लहान असलेल्या उमेळे शाखेने या सोहळ्याचे यजमानपद भूषविताना समाजापुढे एक आदर्श घालून दिला. गावात पुरेसे क्रीडांगण नसताना शेजारच्या गावातील क्रीडांगण भाड्याने घेऊन त्यांनी या क्रीडास्पर्धांचे आयोजन केले. नोकरी-व्यवसायात व्यस्त असलेल्या सर्व समाजबांधवांनी अनेक दिवस परिश्रम करून नियोजनबद्ध आणि ऐक्यभावनेने स्पर्धा यशस्वी करण्यात मोठे योगदान दिले. संघ निर्मितीचे आणि क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाचे ऐक्यवृद्धी हे उद्दिष्ट साध्य होत असल्याचे येथे पावलोपावली जाणवत होते. गावातील अनेकांच्या घरासमोर रांगोळ्या काढणे, क्रीडाज्योतीची मिरवणूक गावापासून क्रीडानगरीपर्यंत आणणे, देखणा ड्रेसकोड, क्रीडांगण, भोजन कक्ष, व्यासपीठ अशा सर्व ठिकाणी बालांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येक जण कार्यकर्त्याच्या भूमिकेत वावरणे हे सर्वच अतिशय प्रशंसनीय आणि आदर्श होते. आर्थिक सुबत्ता, शैक्षणिक विकास, ग्लोबलायझेशन यामुळे एका कुटुंबातही मतभेद होत असल्याच्या पार्श्वभूमीवर समाज ही संस्था विविध उपक्रमांच्या माध्यमातून सर्वांना एकत्र आणू शकते हे या निमित्ताने दिसून आले. उमेळकरांचा ग्रूप फोटो आणि त्यांनी शेवटी केलेला जल्लोष ही याची पावती आहे. उमेळ्यातील प्रत्येकाचे श्रम या कामी उपयुक्त ठरले असले तरी काही जणांचा उल्लेख केल्यावाचून राहवत नाही. शाखाध्यक्ष श्री. विलास वर्तक आणि कबड्डीपटू श्री. आतिश पाटील यांच्यासोबत काही जणांच्या संघपदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठका यशस्वी झाल्या असे म्हणता येईल. खिलाडूवृत्तीचे श्री. आतिश पाटील यांना कबड्डीच्या विजेतेपदाची ढाल उंचावताना मिळालेला आनंद कधीही पैशात मोजता येणार नाही. श्री. प्रवीण वर्तक यांनी मोठी देणगी देऊन क्रीडानगरीला आपली ग्रामदेवता श्री साकाईदेवी मातेचे नाव देताना एका उच्च विचारसरणीचे दर्शन घडविले. स्वागताध्यक्ष श्री. भालचंद्र चौधरी तसेच सर्वश्री मनीष वर्तक, संदेश वर्तक, चेतन वर्तक, आशिष वर्तक, जयदीप चौधरी, विवेक चौधरी आणि अशा अन्य अनेकांचा नामोल्लेख येथे आवश्यक आहे. वयोज्येष्ठ मा. श्री. दीनानाथ चौधरी यांनी आपल्या समाजवास्तूसाठी १,५०,००० रुपयांच्या देणगीचा हप्ता देऊन जसे ठराविक काळाने आपले उत्पन्न वाढते तसे ठराविक काळाने आपण देणगी देत राहावे असा एक आगळावेगळा संदेश स्वोदाहरणाने दिला. सद्वर्तन चषकाची हक्कदार उमेळे शाखाच होती हे त्यांच्या अनेक कृतींमधून सिद्ध झाले. या क्रीडास्पर्धांच्या वेळी आणि निमित्ताने सुमारे १६ लाखांचे प्रत्यक्ष निधी संकलन झाले असले तरी काही लाखांच्या देणग्या देण्याची इच्छा अनेकांच्या मनात निर्माण झाली असेल असा विश्वास वाटतो. उद्दिष्टपूर्तींमध्ये आपण यशस्वी होत आहोत हे नक्की. सर्व समाजबांधवांना मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा!🙏